पुणे : ‘देशाचे माजी उप-पंतप्रधान बाबू जगजीवन राम यांनी समाजासाठी केलेले कार्य प्रेरणादायी आहे. दलित, अल्पसंख्याक आणि मागासवर्गातील घटकांना ताठ मानेने जगण्याची प्रेरणा त्यांनी दिली. त्यांचे स्मरण करताना त्यांच्या कार्यातून शक्ती मिळते. बाबूजींचे हे कार्य यशस्वीपणे पुढे नेताना त्यांची मुलगी म्हणून अभिमान वाटतो,’ असे प्रतिपादन लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीराकुमार यांनी केले.
नवी दिल्ली येथील बाबू जगजीवन राम राष्ट्रीय प्रतिष्ठानतर्फे बाबूजींच्या ३२व्या पुण्यतिथीनिमित्त विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. या प्रसंगी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, अंशुल कुमार, माजी आमदार मोहन जोशी, महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळ आणि प्रतिष्ठानचे सचिव डॉ. विकास आबनावे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष नफेसिंह खोबा, उचित माध्यमच्या रेश्मा चोळे, सुरेश जेठवानी आदी मान्यवर उपस्थित होते.
पुण्यातील उचित माध्यम जनसंपर्क संस्थेचे जीवराज चोळे आणि अॅड. मुकेश परदेशी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार, तर ओवायई फाउंडेशनच्या सिमरन जेठवानी आणि सिस्का एलईडीच्या संचालिका गीतिका उत्तमचंदानी यांना सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
मीराकुमार म्हणाल्या, ‘बाबूजींनी दलितांसाठी, वंचितांसाठी केलेले कार्य मोठे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बाबूजी यांच्या प्रयत्नामुळे आज आपण सर्वजण ताठ मानेने जगतो आहोत. त्यांचे कार्य ही आपल्या सर्वांसाठी शक्तिकेंद्रे बनवून त्यातून प्रगतीच्या वाटेवर चालायला हवे.’
अभिजित अंशुलकुमार म्हणाले, ‘सर्व धर्मांचे तत्व समजून घेतले पाहिजे. सर्व धर्मांचा अभ्यास करून, सर्व धर्मांना सारखे मानून भारतीय राज्यघटना लिहिली गेली आहे. सर्व धर्म आणि धर्मग्रंथांनी मानवतेची शिकवण दिली आहे.’
आठवले यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. डॉ. आबनावे यांनी प्रास्ताविक केले. नफेसिंह खोबा यांनी आभार मानले.